बैसारन येथे अडकले पिंपरी चिंचवडचे ३२ पर्यटक   

पिंपरी : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसारन व्हॅलीत २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर बरेच जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील ३२ पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले आहेत.या समूहात रावेत आणि चिंचवड परिसरातील रहिवासी आहेत. आता त्यांनि मदतीसाठी एक व्हिडीओ केल्याचे समोर आले आहे. 
 
हल्लेखोरांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. या हल्ल्यामुळे पहलगाम आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. अडकलेल्या पर्यटकांच्या गाड्या स्थानिक प्रशासनाने सुरक्षा कारणास्तव जप्त केल्या असून, पुढील आठ दिवस त्या सोडल्या जाणार नाहीत, असे सांगण्यात आले.
 
यामुळे पर्यटक भयभीत झाले असून ते लवकरात लवकर सुरक्षित घरी परतण्यासाठी प्रशासनाकडे मदतीची मागणी करत आहेत. सध्या सर्व पर्यटक सुखरूप असले, तरी त्यांच्यावर मानसिक दबाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परतल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत बैठक घेतली. आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण दिसत आहे. दहशतवाद्यां विरोधात कडक पाऊले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही श्रीनगरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले असून, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी दिनेश पाटील यांच्याशी +91 86683 37101 या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती अडकलेल्या पर्यटकांकडून करण्यात आली. पिंपरी चिंचवड परिसरातील या पर्यटकांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

एका तरुणाशी संपर्क 

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा यातील एका तरुणाशी संपर्क झाला. दोन-तीन दिवस रस्ता बंद केल्याने किंवा वातावरण निवळेपर्यंत आपल्याला जाता येणार नाही. असे या तरुणाने आपल्याला सांगितले. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून या ३२ जणांना महाराष्ट्रात सुखरूप कसे आणता येईल? याबाबत उपाययोजना करण्याची मागणी त्यांच्याकडे केल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

नेमके काय म्हणाले दिनेश पाटील ?

आम्ही १३ एप्रिलला सहलीला निघालो बरीच पर्यटन स्थळे पहिली शेवटचा पॉईंट पहेलगाम होता. रात्री अडकलो सकाळी तिथून बाहेर पडलो. सहलीला आलेल्यांमध्ये बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातील काही जणांना त्रास होत आहे दोन ट्रॅव्हल्सच्या गाड्या थांबवल्या आहेत. आम्हाला मदत मिळाल्यास बरे होईल असे पर्यटकांनी म्हटले आहे.

आश्वस्त केले : अण्णा बनसोडे 

पिंपरी चिंचवड मधील ३२ पर्यटक पहेलगाम मध्ये अडकले आहेत यातील दिनेश पाटील या युवकाशी माझी सकाळी चर्चा झाली. नंतर त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पिंपरी चिंचवड मधील जे ३२ पर्यटक अडकले आहेत त्यात जेष्ठ नागरिक महिला लहान मुले यांचा समावेश आहे. येथे अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप पिंपरी चिंचवड मध्ये कसे आणता येईल याबाबत योग्य ती पावले उचलण्याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाची सुरू केला आहे. आतापर्यंत ८४ लोकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आहे. आणखी दोन ते तीन दिवस रस्ता बंद असल्याने किंवा वातावरण निवळेपर्यंत आपल्याला सोडणार नाही असे पर्यटकांना सांगितले गेले आहे ; मात्र त्यांना महाराष्ट्रात सुखरूप कसे आणता येईल याबाबत लवकरच पावले उचलली जातील असे आश्वासन विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिले.
 

Related Articles